पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध समाजघटक भाजपच्या विचारधारेशी जोडले जात आहेत. पालघरसारख्या आदिवासीबहुल भागासह राज्याच्या विविध भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मानव अधिकार संरक्षण संस्थान, स्वराज्य युवा शक्ती संघटना, स्वराज्य शक्ती संघटना, स्वराज्य महिला शक्ती संघटना आणि शिवउद्योग सहकार सेना आदी संघटनांचा यात समावेश आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मानव अधिकार संरक्षण संस्थानचे पालघर जिल्हाप्रमुख सागर देशमुख आणि शिवउद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र समन्वयक मनोज डहाणुकर यांच्यासह दिनेश देशमुख, अनिल वडे, अपेक्षा रोकडे, मनीषा राणे, कल्पना जाधव, कृष्णा भोईर, राजश्री बेलकर, प्रवीण कोळी, समीर दास, सोदीत शुक्ला आणि प्रवीण वैती या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत देशमुख म्हणाले की, ‘आम्ही ज्या आदिवासी भागात काम करत आहोत त्या भागातील अनेक रस्त्यांच्या विस्तारिकरणाची कामे सुरू असल्याचे आम्ही पाहत आहोत. शिवाय वसई आणि विरार यासारख्या कायम दुर्लक्षित रेल्वे स्थानकांवरही कामे सुरू आहेत. पालघर हा जिल्हा नव्याने अस्तित्वात आला असून, अद्यापही या जिल्ह्याची प्रशासकीय घडी नीटपणे बसू शकली नाही; मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने विकास प्रक्रियेला जो वेग दिला आहे, त्यामुळे प्रभावित होत आम्ही भाजपशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे.’